म्हैसाळ योजनेतील १९ गावच्या शेतकऱ्यांची सलगर येथे अधिकाऱ्यांसोबत बैठक- आ आवताडे

 म्हैसाळ योजनेतील १९ गावच्या शेतकऱ्यांची सलगर येथे अधिकाऱ्यांसोबत बैठक- आ आवताडे 



मंगळवेढा/प्रतिनिधी 


मंगळवेढा तालुक्यातील म्हैसाळ योजनेत समावेश असलेल्या १९ गावांपैकी काही गावांना पुरेसे पाणी मिळत नसल्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या तक्रारी येत आहेत केवळ ऑफिस मध्ये बसून अधिकारी कागदावर बोलत असल्याने म्हैसाळ योजनेच्या सर्व अधिकाऱ्यांची प्रत्यक्ष गावात शेतकऱ्यांसमोर बैठक लावली असून वंचित सर्व शेतकऱ्यांनी लेखी तक्रारीसह 3 फेब्रुवारी रोजी दुपारी एक वाजता सलगर (बु) गावात उपस्थित राहण्याचे आवाहन आ समाधान आवताडे यांनी केले आहे.

 म्हैसाळ उपसा सिंचन योजनेअंतर्गत मंगळवेढा तालुक्यातील रेवेवाडी, हुन्नूर, लोणार, महमदाबाद, पडोळकरवाडी, शिरनांदगी, मारोळी, चिक्कलगी, जंगलगी, सलगर बु, सलगर खु, बावची, पौट, आसबेवाडी, लवंगी, शिवणगी, येळगी, सोड्डी, हुलजंती या १९ गावांना १२७० एमसीएफटी एवढे पाणी मंजूर असताना केवळ ८० एमसीएफटी म्हणजेच फक्त ६ टक्के पाणी या गावांना आजपर्यंत देण्यात आले आहे. या योजनेतील पूर्ण पाण्याची मागणी केली असता केवळ वेळोवेळी विविध तांत्रिक कारणांचा आधार घेऊन पाणीवाटपात एकदुसरेपणा करण्यात येत असल्याचे कृष्णा कोयना उपसा सिंचन प्रकल्पाअंतर्गत म्हैसाळ उपसा सिंचन कालवा सल्लागार समितीच्या बैठकीमध्ये अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले होते  

 म्हैसाळ उपसा सिंचन पाणी योजनेअंतर्गत मंगळवेढा तालुक्यासाठी सांगली जिल्हा जलसंपदा विभाग अंतर्गत म्हैसाळ कालवे उपविभाग वितरिका क्रमांक -२ अन्वये 

तरतूद असणारे पाणी पूर्णदाबाने देण्यात यावे त्याचबरोबर वरील भागांना या योजनेतून ज्या पद्धतीने पाणी मिळते त्याच पद्धतीने पाण्याचे वाटप मंगळवेढा तालुक्यातील जनतेसाठी होणे अपेक्षित असताना पाणी वाटपाचा दुजाभाव केला जाऊ नये, पाणीवाटप संदर्भात टेल टू हेड ही संकल्पना केवळ कागदावर न ठेवता त्याची अंमलबजावणी करून त्या पद्धतीने पाण्याचे वाटप करावे. टंचाई परिस्थितीतून या भागातील गावांना पाण्याचे वाटप करण्याचा ठराव कालवा सल्लागार समितीच्या बैठकीमध्ये करुन तसा प्रस्ताव तयार करण्याचे सांगली व सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांना सूचित केले होते त्यावेळी संबंधित मंत्र्यांनी तात्काळ दखल घेऊन यावर लवकरात लवकर कार्यवाही करावी अशा सूचना अधिकाऱ्यांना दिल्या होत्या मात्र त्या सूचनांची काटेकोर अंमलबजावणी न झालेने शेतकाऱ्याच्या तक्रारी वाढतच गेल्याने पुन्हा शेतकऱ्यांच्या बांधावर अधिकाऱ्यांची बैठक लावून शेतकाऱ्यांसोबत चर्चा करून अडचणी सोडवण्यात येणार असल्याचे आ आवताडे यांनी सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad