डॉ. आंबेडकर यांनी शिका, संघटीत व्हा आणि संघर्ष करा हा मोलाचा मंत्र दिला -शिक्षणतज्ञ प्रा. आर.वाय. पाटील स्वेरीत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती साजरी

 

डॉ. आंबेडकर यांनी शिका, संघटीत व्हा आणि संघर्ष करा हा मोलाचा मंत्र दिला                                                                                                                         

                                                                              -शिक्षणतज्ञ प्रा. आर.वाय. पाटील

स्वेरीत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती साजरी



पंढरपूर– ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना शिक्षण घेताना अनंत अडचणी आल्या. त्यातूनही त्यांनी उच्चशिक्षण घेवून समाजासाठी सर्वस्व अर्पिले. त्यांचे कार्य, त्याग आणि योगदान यांचे महत्व पाहता आज त्यांची जयंती जवळपास १३५ देशात साजरी केली जाते. तुम्ही असे कार्य करा की जगाला तुमच्या कार्याचा हेवा वाटेल. यासाठी जीवनाला सकारात्मकतेने पाहणे आवश्यक आहे. डॉ. आंबेडकर यांनी समाजाला शिका, संघटीत व्हा आणि संघर्ष करा हा अतिशय मोलाचा मंत्र दिला.’असे प्रतिपादन शिक्षणतज्ञ प्रा. आर.वाय. पाटील यांनी केले.

           स्वेरीमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंती निमित्त प्रमुख पाहुणे म्हणून सुळंबी (ता. राधानगरी, जि.कोल्हापूर) मधील आर.वाय. पाटील जनजागृती प्रशिक्षण केंद्राचे संस्थापक व वक्ते प्रा. आर.वाय पाटील हे मार्गदर्शन करत होते. महाराष्ट्र गीत, स्वेरी गीत व भारतरत्न डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमा पूजनानंतर स्वेरीचे संस्थापक व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (ऑटोनॉमस) चे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांनी पाहुण्यांचे स्वागत करून प्रास्तविकात ‘फिटे अंधाराचे जाळे, झाले मोकळे आकाश......’ या कवितेचा सार सांगून ‘माणसाला माणूस म्हणून वागणूक न देणाऱ्या माणसांसाठी आणि समाजात अज्ञानरूपी पसरलेल्या अंधाराला दूर सारण्यासाठी ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ या सूर्याचा जन्म झाला आणि माणसांना माणसात आणण्यासाठी त्यांनी आपले जीवन वेचले शिवाय देश म्हणून आपण एक आहोत हे सांगण्यासाठी राज्यघटनेच्या माध्यमातून देशाला एकत्रित ठेवण्याचे कार्य महामानव डॉ. आंबेडकर यांनी केले.’ असे सांगून त्यांनी स्वेरी गीतातील शब्दांचा भावार्थ समजून सांगितला. पुढे बोलताना पाहुणे प्रा. आर.वाय. पाटील म्हणाले की, ‘ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना पूर्णपणे शिक्षित करून त्यांचे जीवन फुलविण्याचे कार्य सध्या डॉ. रोंगे सर करत आहेत. जीवनाला आकार देण्याचे काम सकारात्मक दृष्टीकोन करतो. म्हणून स्वेरीतून उच्च दर्जाचे गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळत आहे. यासाठी केवळ महापुरुषांच्या जयंत्या साजरा न करता त्यांच्या विचारांचे स्मरण देखील करणे गरजेचे आहे.’ असे आवाहन करून त्यांनी महाड सत्याग्रह, मान सरोवर, चवदार तळे, मनुस्मृती दहन, दलित मंदिर प्रवेश, हिंदू कोर्ट बील आंदोलन, भाक्रा-नांगल प्रकल्प, नदी जोड कालवा, जलप्रकल्प यावर त्यांनी प्रकाश टाकला. यावेळी स्वेरीच्या इंजिनिअरिंग व फार्मसीमधील विविध स्पर्धा, प्रोजेक्ट आणि विविध कलाकौशल्य, क्रीडा, इ. विभागात यश मिळविलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा पाहुण्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. डॉ. नीता तळवलकर यांनी विजेत्या विद्यार्थ्यांच्या नावांचे वाचन केले. यावेळी अभियंता व ह.भ.प. शिवाजीराव रानमळे, साहेबराव भुसे, स्वेरी कॅम्पस इन्चार्ज डॉ. एम.एम. पवार, बी.फार्मसीचे प्राचार्य डॉ. एम. जी. मणियार, डिप्लोमा इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. एन. डी. मिसाळ, डी. फार्मसीचे प्राचार्य प्रा. एस. व्ही. मांडवे, उपप्राचार्या डॉ. मिनाक्षी पवार, विद्यार्थी अधिष्ठाता डॉ. महेश मठपती, डॉ. नीता तळवलकर, इतर अधिष्ठाता, सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालक उपस्थित होते. डॉ. यशपाल खेडकर यांनी सूत्रसंचालन केले. संस्थेचे सचिव डॉ. सुरज रोंगे हे आपल्या भाषणातून डॉ. आंबेडकर यांच्या विचारांची मांडणी करताना म्हणाले की, ‘परिस्थितीला सामोरे जाऊन आणि मनाची कणखरता ठेवून आपण शिक्षण घेतले पाहिजे त्यामुळे या सत्राकडे केवळ मार्गदर्शन म्हणून न पाहता यातून शिस्तीचे धडे घेतले पाहिजेत.’ असे सांगून सर्व उपस्थितांचे आभार मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad