माजी विद्यार्थी मेळाव्याच्या कार्यक्रमातून जीवनाला ऑक्सिजन मिळते
– प्रा. वैशाली घोंगडे
चिंचणीत ‘डॉ. बी.डी.जत्ती महाविद्यालया’चा ‘माजी विद्यार्थी मेळावा’ संपन्न
पंढरपूरः- ‘महाविद्यालय जीवन संपल्यानंतर नोकरी करताना जीवनात अनेक चढ उतार येत असतात. परिवार आणि महाविद्यालयाचे कामकाज सांभाळणे हे करताना तारेवरची कसरत करावी लागते. अशावेळी प्रत्येकाला सामोरे जाणे हे एक प्रकारचे आव्हान असते. हे आव्हान जीवंत ठेवण्यासाठी आपल्या बाल मित्र- मैत्रिणीच्या विचारांची देवान घेवाण होणे गरजेचे असते. म्हणून निदान वर्षातून एकदा तरी माजी विद्यार्थी मेळावा कार्यक्रम घेणे आवश्यक आहे. कारण अशा मेळाव्यातून जीवनाला एक प्रकारे ऑक्सिजन मिळते आणि हेच ऑक्सिजन वर्षभर पुरते.’ असे प्रतिपादन मोहोळ येथील नागनाथ विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्रा. वैशाली घोंगडे यांनी केले.
बिजापूर (कर्नाटक) मधील दक्षिण भारत हिंदी प्रचार सभा संचलित डॉ. बी.डी.जत्ती बी.एड. महाविद्यालयातील सन १९९६ च्या बॅच मधील उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा चिंचणी (ता. पंढरपूर) मधील निसर्गरम्य परिसर असलेल्या ‘चिंचणी ग्रामीण कृषी पर्यटन केंद्रात’ हा ‘माजी विद्यार्थी मेळावा’ संपन्न झाला. याप्रसंगी मुख्य आयोजिकेच्या भूमिकेतून प्रा. वैशाली घोंगडे मार्गदर्शन करत होत्या. राष्ट्रपती पुरस्कार विजेते व तत्कालीन प्राचार्य डॉ. व्ही.आर. देवगिरी यांच्या कडक शिस्ती पासून ते विद्यार्थ्यांच्या चुकांवर पांघरून घालणारे व वेळ परिस्थिती पाहून समजून-उमजून घेणारे गुरुजन वर्गांच्या आठवणी या ‘मेळाव्या’च्या माध्यमातून निघाल्या. पंढरपूर-पुणे हायवे लगत असलेल्या पिराची कुरोली ते टप्पा पासून दिड किमी अंतरावर असलेल्या चिंचणी मधील दाट हिरवळींनी वेढलेल्या शासनाच्या कृषी पर्यटन केंद्रात हा मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यात ना पैशाची घमंड, ना पदाचा गर्व दिसून आला, दिसत होती केवळ मैत्री! प्रशासकिय अधिकारी, प्राचार्य, मुख्याध्यापक, नगरसेवक, उद्योजक, पोलीस अधिकारी, कर्मचारी तर शिक्षणतज्ञ, संस्थापक, हे सर्वजण सर्व एका वनराईत जमा झाले होते. यांध्ये काहीजण शिक्षणक्षेत्र सोडून स्वतःची कंपनी. मार्केटिंग फिल्ड, एस.टी. महामंडळ, यामध्ये स्थिरावले आहेत. शिक्षण क्षेत्रा बरोबरच वेगवेगळ्या क्षेत्रात विविध पदावर काम करत असलेले हे सर्व मित्र आज ‘माजी विद्यार्थी मेळाव्या’च्या चिंचणीच्या निमित्ताने हिरव्या गार पर्यटन केंद्रात एकत्रित आले होते. महाविद्यालयात शिक्षण घेत असताना आलेल्या अनुभवांचा पुढे कसा फायदा झाला हे काहींनी सांगितले ‘माजी विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून ‘पैसे सर्वचजण मिळवतात, परंतु अनुभव हा स्वतःलाच मिळवावा लागतो. त्यासाठी स्वतःलाच प्रचंड परिश्रम करण्याची गरज असते. कारण आईच्या कुशीनंतर महाविद्यालयीन जीवनातच प्रेम, आपुलकी मिळते. प्राध्यापकांनी वेळ प्रसंगी आम्हाला घडविण्यासाठी आमच्या भवितव्यासाठी घेतलेल्या कठोर निर्णयाचा सुरवातीला राग आला परंतु आम्ही ज्यावेळी शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांसमोर उभे राहतो त्यावेळी येथील शिस्त व केलेले संस्कार याचा खूप फायदा होतो हे लक्षात आले.’ असेही उदगार काहींनी काढले. ताण तणाव, कामाचा लोड बाजूला सारून मेळाव्याच्या निमित्ताने सर्वजण एकत्रित आले होते. आचार विचारांची देवाण घेवाण करत दिवस सरला. दिवसभर आयोजिलेल्या कार्यक्रमात अनेकांनी जुन्या आठवणींना उजाळा देत काहींनी भलेमोठे भाषण ठोकले तर काहींनी सुरेल गीत गायले. या बहारदार मेळाव्यात राजश्री टीकांबरे, शशिकला कसबे, नयना देशमाने, उज्वला गोरे, सुधाराणी बगली, रेश्मा मुल्ला, सुरेखा स्वामी, अनिता कारंडे, शांता म्हेत्रे, सुमेधा तांबडे, यमुना राठोड, लक्ष्मण भोसले, विकास जावळे, अभिमान तांबडे, सुखदेव वलेकर, धनंजय जाधव, प्रवीण साठे, अभिमान तांबडे, ताराचंद राठोड, गुलाबसिंग चव्हाण, गुणवंत कदम, शहाजी बिडवे, अंताराम चव्हाण, संजय सुडे, दिलीप मोकाशी, मनोज जोशी, निसार कडेगावकर, धनंजय देठे, विश्वजित लिंगराज, भारत राठोड, संतोष हलकुडे यांच्यासह सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर, लातूर, पुणे, धाराशिव आदी जिल्ह्यातील जवळपास ७० माजी विद्यार्थी सहभागी झाले होते. शशिकांत मल्लाडे यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.

