*यांत्रिकी अभियांत्रिकी विभागात अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न*
पंढरपूर येथील सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळाच्या एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, कोर्टी येथील यांत्रिकी अभियांत्रिकी विभागामार्फत दि. ३ एप्रिल २०२६ रोजी अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांसाठी निरोप समारंभ उत्साहपूर्ण व भावनिक वातावरणात पार पडला.
कार्यक्रमास विभागप्रमुख डॉ. एस. एस. कुलकर्णी, उपप्राचार्य डॉ. स्वानंद जी. कुलकर्णी, प्राचार्य डॉ. कैलाश जगन्नाथ करांडे तसेच प्रशिक्षण व प्लेसमेंट अधिकारी डॉ. समीर कटेकर उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांनी महाविद्यालयीन जीवनातील आठवणी, अनुभव आणि भावनिक क्षण शेअर करत प्राध्यापकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.
समारंभात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या कलागुणांमुळे कार्यक्रमात उत्साहाची भर पडली. चार वर्षांच्या प्रवासातील आठवणी सांगताना विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाने दिलेल्या मार्गदर्शन व संधींबद्दल आभार मानले.
प्रशिक्षण व प्लेसमेंट अधिकारी डॉ. समीर कटेकर यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, सिंहगड महाविद्यालय प्लेसमेंटच्या बाबतीत जिल्ह्यात अग्रस्थानी असून विद्यार्थ्यांना कॅम्पस ड्राइव्ह व विविध रोजगार संधी उपलब्ध करून देण्यासाठी संस्था सतत प्रयत्नशील आहे. त्यांनी विद्यार्थ्यांना आत्मविश्वास, कौशल्य आणि सातत्य यांच्या बळावर करिअर घडविण्याचा सल्ला दिला.
यावेळी विभागप्रमुख, प्राचार्य तसेच उपप्राचार्य यांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढील आयुष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. त्यांनी विद्यार्थ्यांना उद्देशून सांगितले की, जीवनात यश संपादन करण्यासाठी प्रामाणिकपणा, कठोर परिश्रम आणि शिस्त या मूल्यांना विशेष महत्त्व आहे. या गुणांच्या बळावर कोणतीही अडचण सहज पार करता येते आणि उज्ज्वल भविष्य घडविता येते, तसेच त्यांनी विद्यार्थ्यांना बदलत्या काळानुसार स्वतःमध्ये सातत्याने नवनवीन कौशल्ये विकसित करण्याचा सल्ला दिला. आत्मविश्वास, सकारात्मक दृष्टिकोन आणि चिकाटी यांच्या जोरावर प्रत्येकाने आपल्या ध्येयाकडे वाटचाल करावी, असे मार्गदर्शनही त्यांनी केले. त्यांनी विद्यार्थ्यांनी महाविद्यालयातून घेतलेले ज्ञान आणि संस्कार यांचा योग्य वापर करून समाजात आपली वेगळी ओळख निर्माण करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.
कार्यक्रमात उत्कृष्ट शैक्षणिक कामगिरी व विभागासाठी दिलेल्या उल्लेखनीय योगदानाबद्दल सौरभ दिघे यास ‘सर्वोत्कृष्ट अंतिम वर्ष विद्यार्थी’ म्हणून गौरविण्यात आले
या निरोप समारंभामुळे विद्यार्थी व महाविद्यालय यांच्यातील नाते अधिक दृढ झाले असून, हा कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी संस्मरणीय आणि प्रेरणादायी ठरला.
या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी यांत्रिकी अभियांत्रिकी विभागातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी मोलाचे योगदान दिले. त्यांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे हा निरोप समारंभ अत्यंत यशस्वी व अविस्मरणीय ठरला.

