एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग या महाविदयालयामध्ये वादविवाद व रील मेकिंग स्पर्धा उत्साहात संपन्न*

 *एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग या महाविदयालयामध्ये वादविवाद व रील मेकिंग स्पर्धा उत्साहात संपन्न*



पंढरपूर - कोर्टी येथील एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये प्रोफेशनल एथिक्स फोरमच्या वतीने वादविवाद (डीबेट कॉम्पीटिशन ) तसेच रील मेकिंग स्पर्धेचे उत्साहात आयोजन करण्यात आले. शनिवार, दि. ११ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत महाविद्यालयाच्या एसी सेमिनार हॉलमध्ये हा कार्यक्रम पार पडला.

या वादविवाद स्पर्धेत विविध विभागांतील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. स्पर्धेसाठी “तंत्रज्ञानाचा समाजावर परिणाम”, “विद्यार्थ्यांमध्ये सोशल मीडियाचा वाढता प्रभाव”, “नैतिक मूल्यांचे आजच्या काळातील महत्त्व” यांसारखे समकालीन व विचारप्रवर्तक विषय देण्यात आले होते. प्रत्येक सहभागी विद्यार्थ्याला ठराविक वेळेत आपले मत मांडण्याची संधी देण्यात आली. त्यानंतर प्रतियुक्तिवादाच्या फेरीत विद्यार्थ्यांनी समोरच्या मतांना तर्कशुद्ध उत्तर देत आपले विचार अधिक प्रभावीपणे सादर केले.

विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासपूर्ण सादरीकरण, स्पष्ट मांडणी, प्रभावी भाषाशैली आणि मुद्देसूद विचार यांद्वारे उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. परीक्षकांनी वक्तृत्व कौशल्य, विषयाची समज, तार्किक मांडणी, आत्मविश्वास आणि सादरीकरण या निकषांवर स्पर्धकांचे मूल्यमापन केले.

यासोबतच आयोजित करण्यात आलेल्या रील मेकिंग स्पर्धेत विद्यार्थ्यांनी “प्रोफेशनल एथिक्स” या विषयावर आधारित सर्जनशील व्हिडिओ तयार करून समाजाला सकारात्मक संदेश दिला. काही विद्यार्थ्यांनी प्रामाणिकपणा, वेळेचे महत्त्व, व्यावसायिक जबाबदारी आणि सामाजिक बांधिलकी यांसारख्या मूल्यांवर आधारित प्रभावी रील्स सादर केल्या, ज्यांना प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला.

या उपक्रमाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांमध्ये वक्तृत्व कला, तार्किक विचारसरणी, आत्मविश्वास, सर्जनशीलता आणि सामाजिक नैतिकतेची जाणीव विकसित करणे हा होता. अशा स्पर्धांमुळे विद्यार्थ्यांना व्यासपीठ मिळून त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाला चालना मिळते, असे मत उपस्थित प्राध्यापकांनी व्यक्त केले.

कार्यक्रमाचे परीक्षण प्रा. अमित भादुले आणि प्रा. अतुल कुलकर्णी यांनी केले, तर सूत्रसंचालन प्रा. वैष्णवी उत्पात यांनी प्रभावीपणे पार पाडले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रा. महेश जोशी, प्रा. महेश झाडे, प्रा. नागनाथ खांडेकर, प्रा. सचिन घाडगे आणि प्रा. मनोज कोळी यांनी मोलाचे योगदान दिले.

या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, विभागप्रमुख डॉ. श्याम कुलकर्णी, डॉ. अल्ताफ मुलाणी, डॉ. कोंडूरु, डॉ. यशवंत पवार, डॉ. सुभाष पिंगळे, अधिष्ठाता डॉ. चेतन पिसे, डॉ. भालचंद्र गोडबोले आणि डॉ. संपत देशमुख यांच्यासह सर्व प्राध्यापक उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत भविष्यात अशा उपक्रमांमध्ये अधिकाधिक सहभाग घेण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमाच्या शेवटी प्राचार्य डॉ. कैलाश करांडे व उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरित्या संपन्न झाला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad