स्वेरी हे आदरयुक्त शिस्तीचे माहेरघर -पालक प्रतिनिधी चंद्रकांत देसाई स्वेरीज् बी. फार्मसीमध्ये पालक मेळावा संपन्न


स्वेरी हे आदरयुक्त शिस्तीचे माहेरघर

                                          -पालक प्रतिनिधी चंद्रकांत देसाई

स्वेरीज् बी. फार्मसीमध्ये पालक मेळावा संपन्न



पंढरपूर- ‘ज्या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या कलागुणांमध्ये प्रगती दिसून येते, त्याठिकाणच्या शिक्षणात कोणत्याही गोष्टीची कमतरता नसते. कोणत्याही क्षेत्रात जा तेथे कष्ट आणि संघर्षाशिवाय यश बिलकुल मिळत नाही. ‘स्वेरीमध्ये संस्थापक सचिव डॉ. बी.पी. रोंगे सरांच्या मार्गदर्शनाखाली मिळणारे शिक्षण हे उत्तम प्रकारचे असून आमच्या पाल्यांचा या ठिकाणी शैक्षणिक विकास होत आहे. शिक्षण तर सर्वत्र मिळते पण शिक्षणाबरोबरच आदरयुक्त शिस्त व स्वावलंबीपणा स्वेरीतून मिळतो. त्यामुळे आम्ही पालक वर्ग येथील शिक्षणाबाबत मनापासून समाधानी आहोत. पालकांना नेमके काय पाहिजे हे ओळखून स्वेरीने तशी शिक्षण व्यवस्था उपलब्ध करून दिली असून शिक्षणासाठी होत असलेल्या पाठपुराव्यामुळे आमचे पाल्य वेळ वाया न घालवता केवळ शिक्षणाकडेच वळतात. या सवयीमुळे आमचे पाल्य प्रगती साध्य करत असल्याचे दिसून आले. एकूणच स्वेरी हे आदरयुक्त शिस्तीचे माहेरघर असल्यामुळे आमचे पाल्य प्रगतीपथावर आहेत.’ असे प्रतिपादन पालक प्रतिनिधी चंद्रकांत देसाई यांनी केले.

        गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील श्री. विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट संचलित कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये बी.फार्मसी, डी.फार्मसी व एम.फार्मसीच्या वतीने आयोजिलेल्या पालक मेळाव्यात पालक प्रतिनिधी व कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून चंद्रकांत देसाई हे उपस्थित पालक व प्राध्यापकांसमोर आपले मनोगत व्यक्त करत होते. यावेळी महिला पालक प्रतिनिधी म्हणून सौ. क्रांती भारत नागणे व सौ. वैशाली विलास डुबल ह्या व्यासपीठावर उपस्थित होत्या. दीपप्रज्वलनानंतर प्रास्तविकात प्राचार्य डॉ. एम.जी. मणियार म्हणाले की, ‘पालक आणि शिक्षक यांचा सुसंवाद व्हावा व त्यातून विद्यार्थ्यांची प्रगती व्हावी या हेतूने पालक मेळाव्याचे आयोजन केले जाते. यामुळे पाल्यांच्या शैक्षणिक प्रगतीकडे पालकांचे लक्ष राहते तसेच पाल्य अधिक सावध होवून अभ्यासावर लक्ष केंद्रित करतो आणि त्याचा फायदा भविष्यात त्यांनाच होतो तसेच पालकांच्या अडचणीबाबत महाविद्यालयाला देखील सुचनाद्वारे बदल व विकास साधता येतो' असे सांगून महाविद्यालयाला मिळालेले एन.बी.ए. मानांकन तसेच ‘अविष्कार’ मध्ये यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांच्या यशाकडे त्यांनी सर्वांचे लक्ष वेधले. प्लेसमेंट विभागाचे प्रा.पी.ए.जाधव यांनी ‘फार्मसी पदवी प्राप्तीनंतर विद्यार्थ्याना पुढे नोकरीच्या संधी कशा उपलब्ध होतात, संशोधन विभागातील कार्ये, गुणवत्ता यादीतील विद्यार्थ्यांना मिळणारी शिष्यवृत्ती, ट्रिपल पीई, प्रॉक्टर, प्राणायम, नाईट स्टडी, प्रिलिमिनरी एक्झामिनेशन, जी.पी.ए.टी. (ग्रॅज्युएट फार्मसी अॅप्टीटयूड टेस्ट) सेशन, टीपीओ सेशन, बॅकलॉग क्लासेस तसेच पेटंट, कमवा आणि शिका’ योजना, सोलार पॉवर प्लांट, प्ले ग्राउंड, व्यायामासाठी जिमखाना, वाचनालयात उपलब्ध असलेली अभ्यासक्रमाची व स्पर्धा परीक्षेसाठी लागणारी संदर्भ पुस्तके, प्रयोग शाळेत उपलब्ध रसायने, वसतिगृहातील सुविधा, फीडबॅक सिस्टम तसेच औषधांची निर्मिती कशी होते हे पाहण्यासाठी थेट इंडस्ट्रीयल व्हिजीट आदी फार्मसी अभ्यासक्रमाशी निगडीत आवश्यक सुविधांची सविस्तर माहिती दिली. यावेळी अंबादास खराडे व उदय बागल या पालकांनी मनोगत व्यक्त करून आपण समाधानी असल्याचे सांगितले. यावेळी सोलापूर जिल्ह्यासह लगतच्या जिल्ह्यातील असे मिळून जवळपास १०० पालक, प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. प्रा.एस.डी.पाटील व प्रा.एल.एन.पाटील यांनी समन्वयक म्हणून काम पाहिले. प्रा.एच.बी.बनसोडे यांनी सूत्रसंचालन केले तर डी.फार्मसीचे विभागप्रमुख डॉ. जे.बी. कंदले यांनी उपस्थितांचे आभार मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad