ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी कल्पनेपलीकडे विचार करावा : कुलदीप हेगडे
आविष्कार संशोधन स्पर्धेचे कळंब येथे उद्घाटन
इंदापूर प्रतिनिधी गणेश धनवडे
कळंब : इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठानचे विश्वासराव रणसिंग महाविद्यालय, कळंब आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘आविष्कार’ संशोधन स्पर्धेचा उद्घाटन समारंभ संस्थेचे विश्वस्त कुलदीप हेगडे यांच्या हस्ते झाला.
यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक काळंगे, उपप्राचार्य प्रा. ज्ञानेश्वर गुळीग, प्रा. डॉ. प्रशांत शिंदे, आविष्कार संशोधन स्पर्धेचे समन्वयक डॉ. विलास बुवा, कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, इंदापूरचे डॉ. एस. पी. शिंदे, विद्या प्रतिष्ठान महाविद्यालय, बारामतीचे डॉ. संजय खिलारे आदी उपस्थित होते.
प्रास्ताविकात आविष्कार संशोधन स्पर्धेचे समन्वयक डॉ. विलास बुवा यांनी वैज्ञानिक दृष्टिकोनातून विचार करण्याची गरज व्यक्त केली.विज्ञान, तंत्रज्ञान, कृषी, बँकिंग आदी विविध क्षेत्रांत सातत्याने प्रगती होत असून या संशोधनामुळे मानवी जीवन अधिक सुखकर झाले पाहिजे. ग्रामीण भागातही संशोधनाला चालना मिळणे आवश्यक असून विज्ञान आणि संशोधनाची सांगड घालून विद्यार्थ्यांनी नवनवीन आविष्कार घडवावेत, असे त्यांनी सांगितले.
कुलदीप हेगडे म्हणाले, “गरज ही शोधाची जननी आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये संशोधनाची वृत्ती वाढली पाहिजे. विद्यार्थ्यांनी केवळ ठराविक चौकटीत न राहता कल्पनेच्या पलीकडे जाऊन विचार करण्याची गरज आहे.” आधुनिक तंत्रज्ञानातील बदलांचा संदर्भ देताना त्यांनी ॲपलचे स्टीव्ह जॉब्स यांनी भ्रमणध्वनीच्या क्षेत्रात आणि एलन मस्क यांनी उपग्रह तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात केलेल्या कामाचा उल्लेख केला.
प्राचार्य डॉ. अशोक काळंगे यांनी आविष्कार संशोधन स्पर्धेची संकल्पना आणि महत्त्व स्पष्ट केले. राज्यपालांच्या संकल्पनेतून ही स्पर्धा सुरू झाली असून महाविद्यालयात यंदा या स्पर्धेचे दुसरे वर्ष असल्याचे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांनी संशोधनातून समाजोपयोगी उपक्रम आणि नवनवीन संकल्पना पुढे आणाव्यात, असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाचे निवेदन डॉ. बबन साळवे यांनी केले, तर आभार डॉ. रामचंद्र पाखरे यांनी मानले. कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक, विद्यार्थी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

