*“पी.एम. उषा योजनेअंतर्गत पंढरपूर सिंहगड महाविद्यालयामध्ये व्यक्तिमत्व विकास प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न*
पंढरपूर - पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, सोलापूर विद्यापीठ, सोलापूर यांच्या संलग्नतेत आणि एसकेएन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनियरींग येथे प्रधानमंत्री उषा योजनेअंतर्गत व्यक्तिमत्व विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हा दोन दिवसीय कार्यक्रम दिनांक २४ व २५ मार्च रोजी यशस्वीरीत्या पार पडला.
कार्यक्रमाची सुरुवात डॉ. श्रीकांत सुंदरगिरी यांच्या स्वागतपर भाषणाने झाली. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी पुष्पगुच्छ देऊन डॉ. सुंदरगिरी यांचे स्वागत केले. या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी सॉफ्ट स्किल ट्रेनर म्हणून त्यांनी मार्गदर्शन केले. तसेच डॉ. समीर कटेकर यांनी कार्यक्रम समन्वयक म्हणून महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
पीएम-उषा (प्रधानमंत्री उच्चतर शिक्षण अभियान) ही भारत सरकारची उच्च शिक्षणाची गुणवत्ता सुधारण्यासाठी राबवली जाणारी योजना आहे. या योजनेत महाविद्यालये व विद्यापीठांना पायाभूत सुविधा, प्रशिक्षण आणि आर्थिक मदत दिली जाते. यामुळे विद्यार्थ्यांना दर्जेदार, कौशल्याधारित व रोजगाराभिमुख शिक्षण मिळण्यास मदत होते.
या कार्यक्रमात सुमारे ८० विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. दोन दिवस चाललेल्या या प्रशिक्षणात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्व विकासावर विशेष भर देण्यात आला. यामध्ये आत्मविश्वास वृद्धी, कंपनीतील शिष्टाचार, प्रभावी इंग्रजी संवाद कौशल्य आणि व्यावसायिक वर्तन या मूलभूत बाबींवर मार्गदर्शन करण्यात आले. त्याचबरोबर सकारात्मक देहबोली आणि प्रभावी सादरीकरण कौशल्य, ध्येय निश्चिती व वेळेचे सुयोग्य व्यवस्थापन, करिअर रेडीनेस व रोजगारक्षमतेचा विकास, तसेच नेतृत्वगुण आणि योग्य निर्णयक्षमता विकसित करण्यासाठी विद्यार्थ्यांना सखोल व उपयुक्त मार्गदर्शन देण्यात आले.
प्रशिक्षणादरम्यान विविध प्रात्यक्षिके, गटचर्चा, भूमिकानिर्मिती आणि संवादात्मक उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभव देण्यात आला. त्यामुळे विद्यार्थ्यांचा सहभाग अधिक सक्रिय राहिला आणि त्यांनी शिकलेल्या कौशल्यांचा आत्मविश्वासाने सराव केला. या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक दृष्टीकोन, संघभावना आणि प्रभावी संवाद कौशल्ये विकसित होण्यास मोठी मदत झाली.
या प्रशिक्षणामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या करिअरबाबत स्पष्ट दिशा मिळाली असून भविष्यातील स्पर्धात्मक वातावरणाला सामोरे जाण्यासाठी आवश्यक आत्मविश्वास आणि तयारी निर्माण झाली, असे मत सहभागी विद्यार्थ्यांनी व्यक्त केले.
प्रशिक्षणादरम्यान विद्यार्थ्यांनी विविध उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेतला व आपल्या कौशल्यांचा विकास केला. अशा प्रकारचे उपयुक्त कार्यक्रम विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरत असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल महाविद्यालय व विद्यापीठाचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे.

