उपसा सिंचन योजनेच्या मंजुरीने जनतेच्या स्वप्नपूर्तीचा साक्षीदार होण्याचे भाग्य - समाधान आवताडे

 उपसा सिंचन योजनेच्या मंजुरीने जनतेच्या स्वप्नपूर्तीचा साक्षीदार होण्याचे भाग्य - समाधान आवताडे



प्रतिनिधी - पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील जनतेने मतदार संघातील विविध प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी मतदानरुपी दिलेल्या आशीर्वादाला व संधीला मंगळवेढा तालुक्यातील २४ गावे उपसा सिंचन योजनेची मंजुरी घेऊन पात्र ठरलो ही माझे परमभाग्य असल्याचे भावनिक उद्गगार मतदार संघाचे आमदार समाधान आवताडे यांनी काढले आहेत. आमदार समाधान आवताडे यांच्या अथक प्रयत्नांतून अंतिम मंजुरी मिळालेल्या उपसा सिंचन योजनेतील समाविष्ट गावांच्या ग्रामस्थांनी व मतदार संघातील जनतेने आमदार आवताडे यांचा या कामगिरीबद्दल कृतज्ञता सत्कार आयोजित केला होता त्याप्रसंगी सत्काराला उत्तर देताना आमदार आवताडे हे बोलत होते.


या कार्यक्रमाप्रसंगी प्रास्ताविक करताना भाजपा जिल्हा संघटन सरचिटणीस शशिकांत चव्हाण यांनी सांगितले की, विविध विकास कामांच्या रूपाने गेल्या अनेक वर्षांचा मतदार संघाचा निधीचा वनवास संपुष्टात आणणाऱ्या आमदार समाधान आवताडे यांचे या योजनेसाठी असणारे योगदान पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाच्या विकासात्मक इतिहासामध्ये सुवर्ण अक्षरांनी लिहून ठेवले जाईल. दुष्काळी भागातील जनतेचा संवेदनशील मनाने विचार करून त्यांच्यासाठी अहोरात्र झटून त्यांच्या जीवनामध्ये राजयोग निर्माण करणाऱ्या आमदार आवताडे यांची कामगिरी मतदार संघातील जनता कदापि विसरणार नाही असे त्यांनी सांगितले.


तसेच दक्षिण भागातील शेतकरी राजू कुल्लोळी यांनी बोलताना सांगितले की, या योजनेला मंजुरी मिळाल्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून पाण्याची असणारी प्रतीक्षा अखेर संपली आहे. बरं बोलण्यापेक्षा खरं बोलणारा आमदार म्हणून समाधान आवताडे यांची विश्वासहर्ता या कामगिरीमुळे आणखी वाढली असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच तनाळी मठाचे मठाधिपती ह.भ.प.दाजी महाराज, पंढरपूर पंचायत समिती माजी उपसभापती विजयसिंह देशमुख, ज्येष्ठ मार्गदर्शक दत्तात्रय जमदाडे, दामाजी शुगर संचालक अशोक केदार, यशोदा पतसंस्था चेअरमन नीला आटकळे, माजी सरपंच मरगु कोळेकर, सरपंच अनिल पाटील, सुरेश कांबळे, युवक नेते प्रसाद कळसे व व इतर ग्रामस्थ नागरिकांनी यावेळी आपली मनोगत व्यक्त करून आमदार आवताडे यांच्या कामगिरीबद्दल आनंद व्यक्त करून त्यांचे विशेष अभिनंदन केले.


गेली अनेक वर्षे प्रलंबित असलेल्या या उपसा सिंचन योजनेसाठी आमदार समाधान आवताडे यांनी राज्याचे मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून वेळोवेळी अविरतपणे प्रयत्न करून हा प्रश्न मार्गी लावल्याने या भागातील जनतेचे भाग्य उजळले आहे. आमदार आवताडे यांनी केलेल्या अविस्मरणीय कार्यामुळे मंगळवेढा तालुक्याचे लवकरच नंदनवन होण्यास प्रारंभ होईल असा विश्वासही यावेळी उपस्थित जनतेने व नागरिकांनी व्यक्त केला आहे.


पुढे बोलताना आमदार समाधान आवताडे म्हणाले की, राज्य सरकारच्या माध्यमातून या योजनेला अंतिम मंजूरी मिळाल्यानंतर काही राजकीय मंडळींनी भविष्यकाळात येणाऱ्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून या योजनेचे श्रेय घेण्यासाठी अक्षरश: स्पर्धा सुरू केली आहे. परंतु आपण कोणतीही राजकीय अभिलाषा अथवा स्वार्थ डोळ्यासमोर न ठेवता केवळ या भागातील जनतेला पाणी मिळाले पाहिजे हाच दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून माझ्या आमदारकीच्या काळामध्ये प्रामाणिक प्रयत्न केले आणि त्यामध्ये मला सफलता प्राप्त झाली. त्यामुळे यापुढील काळामध्ये ही आपण कोणत्याही प्रकारचे राजकारण न करता मतदार संघातील विविध पाणी योजना व इतर विकास कामे करण्यासाठी माझ्या रक्ताचे पाणी करेन पण जनतेला दिलेली वचने पूर्णच करेल असा ठाम विश्वास आमदार आवताडे यांनी व्यक्त केल्यानंतर उपस्थित नागरिकांनी टाळ्यांच्या कडकडामध्ये त्यांना प्रतिसाद दिला.


या कार्यक्रमासाठी विविध गावांचे सरपंच, उपसरपंच आजी-माजी ग्रामपंचायत सदस्य नागरिक, शेतकरी व महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad