*पंढरपूर सिंहगड महाविद्यालयामध्ये सीपीआर प्रशिक्षण कार्यक्रम उत्साहात संपन्न*
पंढरपूर / तालुका प्रतिनिधी
कोर्टी (ता. पंढरपूर) येथील सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे विद्यार्थ्यांसाठी सीपीआर (हृदय व श्वसन पुनरुज्जीवन प्रक्रिया ) प्रशिक्षण कार्यक्रम उत्साहात पार पडला. शनिवार, दिनांक २८ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाचे आयोजन रोटरी क्लब ऑफ पंढरपूर व रोटरॅक्ट क्लब ऑफ सिंहगड कॉलेज पंढरपूर यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते.
आपत्कालीन परिस्थितीत हृदयविकाराचा झटका आल्यास रुग्णाचे प्राण वाचविण्यासाठी आवश्यक असलेल्या प्राथमिक उपचारांची माहिती विद्यार्थ्यांना देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता. कार्यक्रमाचे मार्गदर्शन रोटेरियन डॉ. नीरज दोडके यांनी केले. त्यांनी हृदयविकाराचा झटका आल्यास तात्काळ सीपीआर कसे द्यावे, त्याची योग्य पद्धत, वेळेचे महत्त्व तसेच प्रत्यक्ष प्रात्यक्षिकाद्वारे विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती दिली. हृदयाची धडकन व श्वसन थांबल्यास दिली जाणारी तातडीची जीवनरक्षक प्रक्रिया. हृदयविकाराचा झटका, बुडणे, विजेचा धक्का, अपघात किंवा श्वास गुदमरल्यास सीपीआर देणे अत्यंत महत्त्वाचे ठरते. हृदय थांबल्यानंतर ४–६ मिनिटांत मेंदूला इजा होऊ शकते. त्वरित सीपीआर दिल्यास मेंदू व महत्त्वाच्या अवयवांना रक्तपुरवठा चालू राहतो. . “योग्य वेळी दिलेला सीपीआर हा रुग्णाचे प्राण वाचवू शकतो,” असे त्यांनी सांगितले. सीपीआर ही प्रत्येकाने शिकण्यासारखी जीवनरक्षक कौशल्य आहे. योग्य प्रशिक्षण आणि तत्पर कृतीमुळे अनेकांचे प्राण वाचू शकतात.
या कार्यक्रमास रोटरी क्लब ऑफ पंढरपूरचे अध्यक्ष रोटेरियन डॉ. वैभव सादिगले यांची प्रमुख उपस्थिती लाभली. तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना अशा कौशल्याधारित प्रशिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी विद्यार्थ्यांना शैक्षणिक ज्ञानासोबतच सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवून अशा उपक्रमांत सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन केले.
कार्यक्रमास विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. एस. बी. पवार, प्रा. ए. एन. गोडसे, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी प्रतिनिधी रोटरॅक्ट क्लबचे उपाध्यक्ष रोटरॅक्टर राहुल चव्हाण, सचिव रोटरॅक्टर पृथ्वीराज सावंत, विश्वतेज पासले, ओम जाधव, शुभम साळुंखे, शेखर रणखांबे आणि मयुर पुरीगोसावी यांनी विशेष परिश्रम घेतले.
अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव वाढून आपत्कालीन परिस्थितीत तत्परतेने मदत करण्याची तयारी निर्माण होत असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.

