आषाढी वारीत वारकऱ्यांची तहान भागवत आहेत स्वेरीचे विद्यार्थी राज्याचे माजी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते पाणी वाटप कार्याचे उदघाटन


आषाढी वारीत वारकऱ्यांची तहान भागवत आहेत स्वेरीचे विद्यार्थी

राज्याचे माजी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते पाणी वाटप कार्याचे उदघाटन



पंढरपूरः श्री विठ्ठलाच्या भेटीसाठी आतूर झालेल्या वारकऱ्यांची तहान दरवर्षीप्रमाणे यंदाही स्वेरीचे विद्यार्थी भागवीत आहेत. राज्याचे माजी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते, पुणे विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषदेचे माजी सदस्य राजेश पांडे, मोहन डांगरे, स्वेरीचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. बी. पी. रोंगे व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत या उपक्रमाचे उदघाटन करण्यात आले. या पाणी वाटपाच्या उपक्रमात श्री. विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित असलेल्या कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (डिग्री), कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (डिप्लोमा), डी.फार्मसी व बी.फार्मसी या चारही महाविद्यालयातील प्राचार्य, उपप्राचार्य, अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापक व विद्यार्थी असे मिळून जवळपास १०० जण सहभागी झाले आहेत.   



         राज्यात तंत्रशिक्षणातून विशेष ओळख निर्माण करणाऱ्या 'स्वेरी' या संस्थेमार्फत, संस्थेच्या स्थापनेपासून अर्थात १९९८ पासून विविध समाजोपयोगी उपक्रम हाती घेण्यात आलेले आहेत. दिंडीतील वारकऱ्यांचा सहभाग पाहता यंदा वारीत वारकऱ्यांची गर्दी अधिक होण्याची चिन्हे दिसत आहेत. परंपरेप्रमाणे दर्शन रांगेतील वारकऱ्यांना आर.ओ. फिल्टर्ड पिण्याचे पाणी वाटपाचे कार्य काल सोमवार (दि.१५ जुलै) पासून सुरु झाले. वारकऱ्यांच्या उपस्थितीत रिद्धी सिद्धी गणपती मंदिरालगत असणाऱ्या पत्राशेड मधील दर्शन मंडप रांगेतील वारकऱ्यांना पिण्याचे शुद्ध पाणी देवून या पाणी वाटपाच्या उपक्रमाचे उदघाटन करण्यात आले. सकाळी ८ ते सायंकाळी ८ या वेळेत गोपाळपूर, रिध्दी-सिध्दी मंदिर व दर्शन बारी, पत्रा शेड या ठिकाणी विद्यार्थी वारकऱ्यांना प्रचंड उत्साहाने आर.ओ. फिल्टर्ड पाण्याचे वाटप करत आहेत. नवमी, दशमी व एकादशी या तीनही दिवशी विद्यार्थी ग्लास, वॉटर जग आणि वॉटर टॅंकद्वारे पाणी वारकऱ्यांपर्यंत पोहचवून वारकऱ्यांची तहान भागवत आहेत. स्वेरीकडून दररोज साधारण आठ ते दहा हजार लिटर पाण्याचे वाटप केले जात आहे. या उपक्रमाच्या उदघाटनावेळी माजी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे म्हणाले की, ‘स्वेरीचे विद्यार्थी हे अभ्यासक्रमात अग्रेसर आहेतच पण आता त्यांच्या हातून समाजकार्य ही उत्तम घडत आहे’ असे म्हणून स्वेरीच्या समाजकार्याचे कौतुक केले. स्वेरीचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. बी. पी. रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वेरीचे कॅम्पस इन्चार्ज डॉ. एम. एम. पवार यांच्या सहकार्याने, डिप्लोमा इंजिनिअरींगचे प्राचार्य डॉ.एन.डी. मिसाळ, विद्यार्थी अधिष्ठाता डॉ. एम.एस.मठपती, प्रा. ए.एस.भातलवंडे, प्रा. पी.एस.वलटे, रा.से.योजनेचे प्रा. आर.एस. साठे, डॉ.डी.एस. चौधरी, समन्वयक प्रा. एन.ए.शिंदे, ‘कमवा व शिका’चे प्रा. ए.ए.पवार, विभागप्रमुख प्राध्यापक वर्ग व विद्यार्थी वारकऱ्यांना पाणी वाटपाचे कार्य मनोभावे करत आहेत. कॉलेजमधून इतर सहकारी पाणी आणून दर्शन रांगेजवळ असलेल्या टाक्यात साठवतात. त्यानंतर ‘राष्ट्रीय सेवा योजना’ व ‘कमवा व शिका’ योजनेतील विद्यार्थी मोठ्या उत्साहाने वारकऱ्यांना पाणी वाटप करत असल्याचे चित्र दिसून येत आहे. प्रत्येक दिवशी २० प्राध्यापक व जवळपास १०० विद्यार्थी दिवसभर मोफत शुद्ध पाणी वाटप करत आहेत. प्रथम वर्ष अभियांत्रिकीचे विभागप्रमुख डॉ. यशपाल खेडकर यांनी या उदघाटन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करून आभार मानले.

विनोद तावडेंच्या फेसबुक पेजवर स्वेरीचे कौतुक: 

राज्याचे माजी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी आपल्या फेसबुक पेजवरून स्वेरीच्या कार्याचे कौतुक करताना लिहिले आहे की, ‘महाराष्ट्राच्या श्रद्धेचा आणि भक्तीचा सोहळा असलेल्या आषाढी एकादशी निमित्त लाखो वारकरी व भाविक विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरला येतात. या विठू भक्तांना पिण्याच्या शुद्ध पाण्याचे मोफत वाटप करण्याचा अतिशय स्तुत्य उपक्रम पंढरपूरच्या श्री. विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट संचलित विविध महाविद्यालयांच्या संयुक्त विद्यमाने हाती घेण्यात आला आहे. या सेवाभावी उपक्रमाचे उदघाटन करण्याची संधी आज मला लाभली.’

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad