विठ्ठल कारखाना सक्षमपणे चालविणार – डॉ बी.पी.रोंगे श्री.विठ्ठल सहकारी साखर कारखाना निवडणूक प्रचाराचा फोडला नारळ


विठ्ठल कारखाना सक्षमपणे चालविणार

                                                       – डॉ बी.पी.रोंगे



श्री.विठ्ठल सहकारी साखर कारखाना निवडणूक प्रचाराचा फोडला नारळ


पंढरपूर- ‘तालुक्यातील राजवाडा असलेल्या वेणूनगर येथील श्री. विठ्ठल सहकारी साखर कारखाना हा बिनविरोध व्हावा यासाठी सुरवातीपासून अनेकांबरोबर चर्चा केली, परंतु सर्व प्रयत्न अखेर निष्फळ ठरले आणि निवडणुकीचे फॉर्म भरण्यासाठी गर्दी होऊ लागली. पुढे माझी भूमिका पाहून अनेक चर्चा सुरू होत्या, गैरसमज वाढत होते, अफवा निर्माण होत होत्या. त्यामुळे, डॉ. रोंगे सर अजून शांत कसे आहेत? असा प्रश्न उपस्थित होऊ लागला. दरम्यान माझा अर्ज मंजूर होऊ नये यासाठी अनेक अडथळे निर्माण केले गेले. यावर मी न्याय मागितला आहे. शेतकरी, कामगार वर्ग आणि सभासद यांना न्याय मिळावा यासाठी निर्मळ भावनेने ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी प्रयत्न केले परंतु ते निष्फळ ठरले. शेवटी ठरवले आणि आज निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडला. या कारखान्याच्या निवडणुकीद्वारे सर्व शेतकरी सभासद, कामगार वर्ग यांना साथ व न्याय देणार असून हा कारखाना सक्षमपणे चालवणार आहे.’ असे प्रतिपादन स्वेरी या राज्यात लोकप्रिय असलेल्या शिक्षण संस्थेचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे यांनी केले.

         श्री.विठ्ठल सहकारी साखर कारखाना वेणुनगरच्या निवडणुकीला आज खऱ्या अर्थाने रंग चढल्याचे दिसून आले. त्याचे कारण म्हणजे सर्वांचे विशेषतः तालुक्यातील तमाम शेतकरी, कारखाना कामगार आणि सभासदांचे लक्ष वेधलेले व अभ्यासू नेतृत्व असलेल्या डॉ. बी.पी.रोंगे सरांनी आज ऐन एकादशीच्या निमित्ताने साक्षात विठ्ठलाच्या साक्षीने नामदेव पायरीजवळ नारळ वाढवून प्रचाराचा शुभ मुहूर्त केला. मागील वेळी सत्ताधारी असलेले भारत भालके यांच्या विरोधात तब्बल सहा हजार मते मिळवून आपल्या अभ्यासू नेतृत्वाचे सक्षमपणे दर्शन घडवले होते. त्यामुळे त्यावेळी लक्षवेधी ठरलेले डॉ.बी.पी.रोंगे सर त्यावेळी जरी पराभूत झाले असले तरीही त्यांना मिळालेली मते ही विजयाच्या समीप नेणारी होती. त्यामुळे आज पंढरपूरच्या नवीन एसटी स्टँड समोर असलेल्या विठाई नागरी पतसंस्थेपासून तालुक्यातील शेतकरी, कामगार, सभासद वर्ग, नागरिक आणि सहकाऱ्यांसह चालत जाऊन नामदेव पायरी जवळ प्रचाराचा नारळ फोडला. तेथून त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात येऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. तेथून जवळच असलेल्या राजमाता जिजाऊ, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, वीर सावरकर, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांना पुष्पहार अर्पण करून कोर्टी येथील महादेव मंदिरात दर्शन घेऊन प्रचाराचा शुभारंभ केला. यावेळी त्यांच्या समवेत श्री विठ्ठल परिवर्तन व विकास पॅनलचे प्रचार प्रमुख संभाजीराजे शिंदे, पांडुरंग नाईकनवरे, पोपट पाटील, तात्यासाहेब होळकर, सरकार यादव, नितीन काळे, पांडुरंग देशमुख सौ.प्रेमलता रोंगे, यांच्यासह तालुक्यातील शेतकरी, सभासद व सहकारी उपस्थित होते. त्यानंतर डॉ.रोंगे सरांनी सायंकाळ पर्यंत तालुक्यातील कोर्टी, सोनके, तिसंगी या ठिकाणी भेट देवून सभासदांशी चर्चा केली. सरांच्या प्रचारामुळे आता निवडणुकीत खऱ्या अर्थाने चुरस निर्माण जरी झाली असली तरी एक अभ्यासू नेतृत्व पुढे आल्याने सर्व समीकरणे बदलणार आहेत, हे मात्र निश्चित!

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad