युवा पिढीवर महाराष्ट्र घडविण्याची जबादारी आहे. -विधानसभेचे अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर
स्वेरीत ‘ज्ञान, तंत्रज्ञान आणि युवाशक्तीच्या माध्यमातून विकसित महाराष्ट्राची निर्मिती’ यावर मार्गदर्शन सत्र संपन्न
पंढरपूर- ‘आजचा विद्यार्थी आपला वेळ हा विज्ञान व तंत्रज्ञान संदर्भातील टूल्स वाचन करण्यात घालवत असतो. स्वेरीतील विद्यार्थ्यांशी संवाद होणे हा एक अविस्मरणीय क्षण आहे. पंढरपूरची ही धरती श्रद्धेची, शेतकऱ्यांची व ज्ञानाची धरती आहे म्हणून या त्रिवेणी संगमाच्या धरतीला चरण स्पर्श करताना मनस्वी आनंद वाटतो. ज्या भूमीत पांडुरंगाच्या दर्शनासाठी लाखो भाविक व वारकरी भक्तिभावाने येतात त्याच भूमीत तंत्रज्ञानाची नवी पिढी घडत आहे, ही साधी सोपी गोष्ट नाही. विज्ञान आणि तंत्रज्ञान जोपर्यंत सामान्य माणसांपर्यंत पोहचत नाही, तोपर्यंत प्रगतीला अर्थ नाही. शिक्षकांच्या माध्यमातून येणार्या युवा पिढी समोर एकविसाव्या शतकातील महाराष्ट्र घडवण्याची जबाबदारी आहे.’ असे प्रतिपादन महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर यांनी केले.
स्वेरीमध्ये ‘ज्ञान, तंत्रज्ञान आणि युवाशक्तीच्या माध्यमातून विकसित महाराष्ट्राची निर्मिती’ या विषयावर आयोजिलेल्या मार्गदर्शन सत्रात महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर हे मार्गदर्शन करत होते. अध्यक्षस्थानी पंढरपूर- मंगळवेढा विधानसभेचे आमदार समाधान अवताडे हे होते. महाराष्ट्र गीत, स्वेरीगीत व दीपप्रज्वलनानंतर स्वेरीचे संस्थापक व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (ऑटोनॉमस)चे प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे यांनी प्रास्ताविकात सर्वांचे स्वागत करून स्वेरीची पार्श्वभूमी सांगितली. श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूटच्या नावातच असलेल्या संशोधनामुळे आता विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण करत ही संस्था संशोधनामध्ये प्रगती करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पुढे बोलताना अॅड. नार्वेकर म्हणाले की, ‘स्वेरी कॅम्पसमध्ये प्रामुख्याने इंग्रजी भाषा वापरली जाते. तरीपण आपल्या विद्यार्थ्यांना इंग्रजी, हिंदी, मराठी भाषा ही उत्तमपणे येते ही बाब अत्यंत महत्वाची आहे. भारतात साधी सुई बनत नव्हती परंतु आज इथे सर्वांच्या परिश्रमाच्या जोरावर भारतातील माणूस चंद्रावर पोहचत आहे. ही तंत्रज्ञानाची कमाल आहे. विद्यार्थ्यांनी तंत्रज्ञानात योग्य शिक्षण प्राप्त केले तर जगातील सर्वोत्तम देश म्हणून भारत देश पुढे येईल म्हणून येणाऱ्या काळात विद्यार्थ्यांना जबाबदारीने वाटचाल करावी लागेल. महाराष्ट्र औद्योगिक क्षेत्रात देशात एक नंबरवर आहे. येणाऱ्या काळात ‘डेटा सेंटर’ वाढत आहेत. महाराष्ट्रात ‘डेटा सेंटर’ केंद्रस्थानी राहील. ज्याच्याकडे योग्य नेता आहे, तेथे योग्य शक्ती असते. येणार्या काळात महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात डेटा सायन्सच्या माध्यमातून नवीन तंत्रज्ञानाला विकसित करता येत आहे त्यामुळे आपले जीवन आणखी सोपे होईल परंतू पुढील काळ अधिक आव्हानात्मक बनेल हेही तितकेच खरे आहे. आता ‘एआय’ च्या माध्यमातून शेती, व्यवसाय प्रचंड प्रमाणात वाढत आहेत. त्यामुळे लोकांचे जीवन सुखी-समृद्ध होत आहे. म्हणून तरुण वर्गाला गुणवत्तापूर्ण केले तर भारत भविष्यात नंबर एक वर राहील, हे मात्र निश्चित. तंत्रज्ञानाशिवाय विकास हा अशक्यच आहे म्हणून आजच तंत्रज्ञानाकडे लक्ष देणे अत्यंत आवश्यक आहे. लोकशाही टिकवायची असेल तर जबाबदाऱ्या व्यवस्थितपणे हाताळाव्या लागणार आहेत. जीवनात यशस्वी बनायचे असेल तर परस्पर सहकार्य करण्याची गरज आहे. लोकशाहीत वेगवेगळे विचार एकत्र येऊन पुढे त्यातून चांगले निर्णय घेणे शक्य आहे म्हणून लोकशाही टिकवायची असेल तर येणाऱ्या काळात आपले विचार व्यक्त करणे गरजेचे आहे. मूलभूत अधिकाराबरोबर संविधानात्मक विरोध करणेही तितकेच आवश्यक आहे.’ असे सांगत त्यांनी शास्त्रज्ञ मार्टिन लूथर किंग यांचे विचार ऐकवले. अध्यक्षस्थानावरून बोलताना आमदार समाधान आवताडे म्हणाले की, ‘महाराष्ट्र ही संतांची, समाज सुधारकांची आणि थोरांची भूमी आहे. अशा भूमीत विज्ञान, तंत्रज्ञान व युवाशक्तीचा ताळमेळ लागला तर हा महाराष्ट्र जगाच्या होत असलेल्या प्रगतीत भर पाडण्याचे कार्य करेल. प्रगत राष्ट्रे ही ज्ञानाच्या जोरावर प्रगती करण्याचे काम करत आहेत आणि हे कार्य युवाशक्ती करत आहे. युवक हे देशाचे आधारस्तंभ आहेत. या माळरानावर छोटेसे रोपटे लावण्याचे काम डॉ. रोंगे सरांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी केले. आता याला गुणवत्तेची जोड मिळत असून याचे वटवृक्षात रूपांतर झाले आहे. एसीआयसी - स्वेरी या केंद्राच्या माध्यमातून झालेल्या संशोधनातून एका नालंदा विद्यापीठाच्या प्रतिकृतीची निर्मिती करण्याचे काम स्वेरीने केले आहे. या केंद्रामुळे ग्रामीण भागातील तरुणांमध्ये असलेल्या कल्पकतेला मोठी चालना मिळत आहे. स्वेरीचे कार्य हे नालंदा विद्यापीठाप्रमाणे सुरु आहे. आज जर नालंदा विद्यापीठ असले असते तर आपला भारत हा जगातील प्रचंड शक्तिशाली भारत राहिला असता हे त्यांनी अभ्यासपूर्ण भाषणातून सांगितले. यावेळी विधानसभेचे कायदेशीर सल्लागार अॅड. संदीप केकाणे, स्वेरीचे कॅम्पस इन्चार्ज डॉ. एम.एम. पवार, बी.फार्मसीचे प्राचार्य डॉ. मिथुन मणियार, स्वेरी लॉ कॉलेजच्या प्राचार्या डॉ. बनकर, डिप्लोमा इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ.एन.डी.मिसाळ, डी.फार्मसीचे प्राचार्य डॉ. सतिश मांडवे, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या उपप्राचार्या डॉ. मिनाक्षी पवार, इतर अधिष्ठाता, सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. सागर घोडके यांनी केले तर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूरच्या विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. प्रशांत पवार यांनी आभार मानले.

