*कर्मयोगी इन्स्टिट्यूटमध्ये साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचा जन्मदिन 'लेखन प्रेरणा दिन' म्हणून उत्साहात साजरा.*
पंढरपूर : महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या निर्देशानुसार कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, पंढरपूर येथे 1 ऑगस्ट हा साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचा जन्मदिन 'लेखन प्रेरणा दिन' विविध उपक्रम राबवून उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासोबतच सामाजिक, सांस्कृतिक व राष्ट्रीय जाणीवा वृद्धिंगत करण्याच्या उद्देशाने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमांना विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
या उपक्रमांतर्गत लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शनपर कार्यक्रम, जनजागृतीपर उपक्रम तसेच शैक्षणिक व सामाजिक विषयांवरील उपक्रम राबविण्यात आले. विद्यार्थ्यांना सामाजिक बांधिलकी, राष्ट्रीय एकात्मता, जबाबदार नागरिकत्व आणि सकारात्मक जीवनमूल्यांचे महत्त्व समजावून सांगण्यात आले.
दि. ८ ऑगस्ट २०२६ रोजी श्रीमती लता घोडके यांचे 'साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे : व्यक्तित्व आणि साहित्यिक कर्तृत्व' या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यामध्ये त्यांनी लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या विविध कथा, कादंबरी, पुस्तके यावर विवेचन करून विद्यार्थ्यांना लेखन व वाचनासाठी प्रेरित केले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी उपप्राचार्य प्रा. जगदीश मुडेगांवकर होते तर डॉ. अभय उत्पात यांनी आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली
त्यानंतर दि. १२ ऑगस्ट २०२६ रोजी विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी 'साहित्यरत्न: अण्णा भाऊ साठे व्यक्तित्व व साहित्यिक कर्तृत्व' या विषयावर निबंध लेखन केले.
दि. १३ ऑगस्ट २०२६ रोजी 'साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे: व्यक्तित्व व साहित्यिक कर्तृत्व या विषयावर वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेला विद्यार्थ्यांचा भरघोस प्रतिसाद लाभला. सदर स्पर्धेसाठी प्रा. सुशील कुलकर्णी यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.
तसेच दि. १४ ऑगस्ट २०२६ रोजी संस्थेच्या ग्रंथालयात ग्रंथप्रदर्शन उपक्रम राबविण्यात आला.
या उपक्रमात विद्यार्थ्यांना विविध साहित्य, वाचनसंस्कृती आणि ज्ञानवृद्धीच्या संधींची माहिती देण्यात आली. या उपक्रमास विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत सहभाग नोंदविला.
या सर्व उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड, सामाजिक भान, राष्ट्रीय भावना आणि जबाबदारीची जाणीव निर्माण होण्यास मदत झाली. संस्थेच्या वतीने विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अशा उपक्रमांचे सातत्याने आयोजन करण्यात येत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
श्री पांडुरंग प्रतिष्ठानचे विश्वस्त रोहन परिचारक, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एस पी पाटील, कर्मयोगी पॉलिटेक्निकचे प्राचार्य डॉ ए बी कणसे, रजिस्ट्रार गणेश वाळके आदींनी या उपक्रमाचे कौतुक करून विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. हे सर्व उपक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा. कुबेर ढोपे यांनी विशेष परिश्रम घेतले.



