जवाहर विद्यार्थीगृह संस्थेकडून चैताली भस्मे यांचा भव्य सत्कार
नागपूर : जवाहर विद्यार्थीगृह संस्था, सिव्हिल लाइन्स, नागपूर यांच्या वतीने तेली समाजातील गुणवंत विद्यार्थी, पीएचडी धारक युवक-युवती तसेच विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कर्तृत्ववान व्यक्तींचा भव्य सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला. या समारंभात मनीष नगर, नागपूर येथील अष्टपैलू व्यक्तिमत्त्व आणि विविध सामाजिक व पर्यावरणीय उपक्रमांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या सर्पमित्र, प्राणीमित्र, निसर्गमित्र, वन्यजीव रक्षक, मांगल्य फाऊंडेशनच्या अध्यक्षा, अभिनेत्री व गीतकार चैताली भस्मे यांची विशेष सत्कारासाठी निवड करण्यात आली.
चैताली भस्मे यांनी सर्प व वन्यजीव संरक्षण, प्राणीमित्र म्हणून केलेले कार्य, निसर्ग संवर्धन तसेच सामाजिक क्षेत्रातील योगदान यामुळे त्यांनी आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. विविध क्षेत्रांत सातत्याने कार्यरत राहून समाजामध्ये जनजागृती करण्याचे काम त्या करत आहेत. त्यांच्या या बहुआयामी कार्याची दखल घेत जवाहर विद्यार्थीगृह संस्थेच्या वतीने त्यांचा गौरव करण्यात आला.
संस्थेचे अध्यक्ष तथा माजी उपमहापौर मा. शेखर सावरबांधे यांच्या हस्ते चैताली भस्मे यांना शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, सन्मानपत्र व स्मृतिचिन्ह प्रदान करून सन्मानित करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी चैताली भस्मे यांच्या सामाजिक, पर्यावरणीय व वन्यजीव संवर्धनाच्या कार्याचे तोंडभरून कौतुक केले.
सर्प व वन्यजीवांबाबत समाजामध्ये असलेले गैरसमज दूर करणे, प्राण्यांचे संरक्षण करणे आणि निसर्ग संवर्धनाचा संदेश सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी चैताली भस्मे सातत्याने प्रयत्नशील आहेत. सामाजिक कार्यासोबतच कला क्षेत्रातही त्यांनी आपला ठसा उमटविला असून अभिनेत्री आणि गीतकार म्हणूनही त्या कार्यरत आहेत. त्यामुळे त्यांच्या कार्याची व्याप्ती सामाजिक, पर्यावरणीय आणि सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रांत असल्याचे यावेळी मान्यवरांनी नमूद केले.
या सत्कारामुळे चैताली भस्मे यांच्या कार्याला समाजाकडून मिळालेली ही विशेष दखल असून, त्यांच्या पुढील सामाजिक व पर्यावरणीय कार्याला निश्चितच प्रेरणा मिळणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
या कार्यक्रमास गंगाधर काचोरे, नरेंद्र कुमार दिवटे, हर्षवर्धन बेले, बालानंद टापरे, विश्वस्त सुखदेव वंजारी यांच्यासह जवाहर विद्यार्थीगृह संस्थेचे पदाधिकारी, समाजबांधव, विद्यार्थी, विविध क्षेत्रातील मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमात कर्तृत्ववान व्यक्तींच्या सन्मानातून समाजातील गुणवंतांना प्रोत्साहन देण्याचा आणि सामाजिक योगदानाची दखल घेण्याचा संस्थेचा सकारात्मक उपक्रम अधोरेखित झाला.

