मोहोळ तालुक्यासाठी दोन नवीन महावितरण उपविभागांना मान्यता
मोहोळ
मोहोळ तालुक्यात गेल्या काही वर्षांत लोकसंख्या, शेतीक्षेत्र व सिंचन क्षेत्र मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. यामुळे वीज वापर झपाट्याने वाढला असून विद्यमान मोहोळ महावितरण उपविभागावर कामाचा ताण प्रचंड वाढला होता. ग्राहकसंख्या, वाढती कनेक्शन्स, वितरण रोहित्रांवरील भार आणि सिंचन क्षेत्राची झपाट्याने वाढ यामुळे या उपविभागाचे विभाजन करणे अत्यावश्यक झाले होते.
या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मुख्य प्रवक्ता व सोलापूर जिल्हाध्यक्ष मा.श्री. उमेशदादा पाटील यांनी जानेवारी २०२५ पासून सातत्याने शासनस्तरावर पाठपुरावा सुरू केला होता. दिनांक २७ मे २०२५ रोजी त्यांनी मुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस साहेब यांना लेखी निवेदन सादर केले होते.
या प्रस्तावाच्या मंजुरीसाठी मोहोळ तालुक्याचे पालकमंत्री मा. जयकुमार गोरे साहेब यांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे ठरले. गोरे साहेब यांनी स्वतः मुख्यमंत्री व ऊर्जामंत्र्यांकडे वारंवार पाठपुरावा करून ही मागणी मान्य करून घेतली.
मुख्य कारणे :
1.ग्राहक व कनेक्शन्स वाढ – मोहोळ उपविभागातील ग्राहकसंख्या प्रचंड वाढली असून ३३ केव्ही फीडर व वितरण रोहित्रांवर अतिरिक्त भार.
2.सिंचन क्षेत्र विस्तार – भीमा व सीना नदीकाठची शेती मोठ्या प्रमाणात सिंचनाखाली.
3.जलसिंचन प्रकल्पांचा परिणाम – अंडी व शिरापूर जलसिंचन योजना कार्यान्वित झाल्याने ऊर्जा वापर मोठ्या प्रमाणात वाढला.
4.वीज पुरवठ्यातील अडचणी – विद्यमान उपविभागामुळे सेवा वेळेत व दर्जेदार पद्धतीने देण्यात अडचणी.
निर्णयाचा फायदा :
•मोहोळ तालुक्यातील शेतकरी व वीजग्राहकांना अखंडित व दर्जेदार वीज सेवा उपलब्ध.
•सिंचनासाठी तातडीचा वीजपुरवठा सुनिश्चित.
•उद्योग, व्यापारी व घरगुती ग्राहकांना सोयीस्कर सेवा.
•वीज व्यवस्थापनातील ताण कमी होऊन यंत्रणा अधिक सक्षम व कार्यक्षम होईल.
मा.उमेशदादा पाटील यांनी म्हटले :
“मोहोळ तालुक्यातील वाढत्या वीज मागणीला प्रतिसाद म्हणून नवीन दोन उपविभागांची निर्मिती ही काळाची गरज होती. या मागणीस अखेर मान्यता मिळाल्याने शेतकरी व नागरिकांना दिलासा मिळणार आहे. यासाठी मी जानेवारीपासून सातत्याने पाठपुरावा करत होतो. विशेष म्हणजे, या प्रक्रियेत पालकमंत्री मा. जयकुमार गोरे साहेब यांनी घेतलेली मेहनत व केलेला सातत्यपूर्ण पाठपुरावा अत्यंत महत्त्वाचा ठरला.”

